संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता. २८)
दौंड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या पारगाव गावातील पांडवकालीन श्री शंभु महादेव मंदिर आज अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकेकाळी श्रद्धेचे केंद्र असलेले हे प्राचीन मंदिर आता भग्नावस्थेत ढासळत असून, त्याचे उरलेसुरले अवशेषही अखेरची घटका मोजत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
मंदिराच्या शिखराची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने संपूर्ण रचना आता मात्र धोकादायक बनली आहे. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही प्रशासन आणि संबंधित यंत्रणा मात्र अद्यापही ‘झोपेत’ असल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी बैठका, चर्चा, आश्वासने आणि देणग्यांच्या घोषणा होत आल्या; मात्र प्रत्यक्षात एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुरु उमटत आहे.
सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या पारगावसारख्या मोठ्या गावात इतक्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची अशी दुर्दशा होणे ही गावासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे दौंड तालुक्यातील इतर शंभु महादेव मंदिरांच्या तुलनेत पारगावचे मंदिर सर्वाधिक भग्नावस्थेत असल्याचे स्थानिकांचे ठाम मत आहे.
या पार्श्वभूमीवर शंभूभक्तांच्या मताचा आदर करून योग्य ती भूमिका घेत तात्काळ पुनर्बांधणी सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. गावाच्या अस्मितेचा प्रश्न बनलेल्या या मंदिराच्या जतनासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांनी तातडीने एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.
अन्यथा, इतिहासाच्या पानांवरून पारगावचे हे श्रद्धास्थान कायमचे पुसले जाण्याची भीती भाविकांच्यातून व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक:
























