संघर्ष नायक वृत्तसेवा यवत (ता.१४)
आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी यवत येथे आमदार राहुल कुल विचारमंचच्या तरुणांनी सेवाभावी उपक्रम राबविला. वारकऱ्यांना नाश्ता, चहा, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, साबण तसेच अन्य आवश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
पालखी सोहळ्यानिमित्त यवतमध्ये मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. उन्हाचा तडाखा आणि प्रवासाचा थकवा लक्षात घेऊन विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी अल्पोपहार केंद्र उभारले. येथे वारकऱ्यांना प्रेमाने नाश्ता व गरम चहा देण्यात आला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, साबण आणि अन्य आवश्यक साहित्याचेही वितरण करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तरुणांच्या कार्याचे कौतुक केले. वारकरी संप्रदायाची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून अनेक युवकांनी या उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
यावेळी आमदार राहुल कुल विचारमंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक युवक उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.

























