संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१०)
वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षलागवड क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने सागर शेलार यांना प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर केला आहे. त्यांच्या निवडीमुळे पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या पुरस्कारासाठीची निवड राज्य शासनाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात आली. या समितीत वनमंत्री गणेश नाईक, अपर मुख्य सचिव (महसूल व वन विभाग) दीपक म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख, नागपूर) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, पुणे) विवेक खांडेकर तसेच मुख्य वनरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांचा समावेश होता.
सागर शेलार यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि जनसहभागातून हरित उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ हा वनसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा मानाचा पुरस्कार मानला जातो. सागर शेलार यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी आणि वनक्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याबद्दल गौरव व्यक्त केला जात आहे.

























