पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा ता.०८
दौंड तालुक्यातील नानगाव येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या वैकुंठ रथाच्या पूजन सोहळ्याला गुरुवारी (दि. ७) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील अंत्यसंस्कार व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या वाहनाची कमतरता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत हा समाजोपयोगी उपक्रम साकारला.
गावातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना रात्री-अपरात्री भीमा नदीलगत असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मृतदेह वाहतुकीसाठी योग्य वाहन उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची अनेकदा गैरसोय होत होती. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी उभारण्याचा निर्णय घेतला.
गावातील दानशूर नागरिकांच्या सहकार्याने तब्बल ३ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. या निधीतून सुसज्ज आणि आकर्षक वैकुंठ रथ तयार करण्यात आला असून, आता गावकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून, सर्व स्तरांतून या संकल्पनेचे कौतुक होत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम खळदकर, सी. बी. खळदकर, विश्वास भोसले, दादासो खळदकर, प्रल्हाद रासकर आणि दीपक पवार यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नानगावमध्ये एक आदर्श उपक्रम उभा राहिला आहे.
दरम्यान, या आकर्षक वैकुंठ रथाची निर्मिती अहिल्यानगर येथील बेलवंडी फाटा परिसरातील प्रसिद्ध कारागीर टिळेकर बंधूंनी केली आहे. नानगावच्या या उपक्रमातून तालुक्यातील इतर गावांनाही प्रेरणा मिळणार असून, अशा प्रकारची संकल्पना ग्रामीण भागात अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक:
























